नांदेड (प्रतिनिधी) :- जिल्हयामध्ये ४ लाख ३४ हजार २५१ हे. क्षेत्रावर सोयाबिन पिकाची पेरणी झाली आहे. जवळपास सर्व शेतकऱ्यांनी सोयाबिनचा पिक विमा काढलेला आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबिन पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे. विमा कंपनी व कृषि विभाग नुकसानीचे पंचनामे करत आहे. येत्या ३ ते ४ दिवसात पंचनामे पुर्ण करण्यात येणार असून, विमा कंपनी इतर पिकांसोबत सोयाबिन पिकाची देखील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
संभाव्य अवकाळी पावसापासुन पिकाचे नुकसान होणार नाही यादृष्टीने शेतकऱ्यांनी सोयाबिन जर हाती लागले असेल तर अशा काढणीला आलेल्या सोयाबिन पिकाची १५ ऑक्टोबर पुर्वी काढणी करून घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. काही वृत्तपत्रामध्ये ८ ऑक्टोंबर २०२१ रोजी प्रसिध्द झालेल्या बातमीत पिक विमा आगाऊ मिळणेसाठी नांदेड जिल्हयामध्ये सोयाबीनचा उल्लेख केलेला नसल्याचे दिसून आले. यामूळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या व कृषी विभागाच्या वतीने ही वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.